
चंद्रपूर : ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन देशातील व चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील हजारो वृद्ध पेन्शनधारकांना न्याय द्यावा, यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती (जिल्हा चंद्रपूर) च्या वतीने जिल्हा सचिव प्रकाश राठोड व त्यांच्या प्रतिनिधीमंडळाने दिलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली गाठून हा प्रश्न केंद्रीय पातळीवर तातडीने लावून धरला.
अनेक वर्षांच्या समर्पित सेवेनंतरही ईपीएस-९५ योजनेअंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळत असून, सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात वृद्ध पेन्शनधारकांना सन्मानाने जगणे आणि वैद्यकीय उपचार घेणे कठीण झाले आहे, ही बाब खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ईपीएस-९५ पेन्शनधारकांना दरमहा किमान ७,५००/- अधिक महागाई भत्ता मंजूर करण्याची, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वेतनावर उच्च पेन्शनचा पर्याय विनाभेदभाव उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
याशिवाय, सर्व ईपीएस-९५ पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदारास मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि या योजनेपासून वंचित राहिलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा ५,०००/- पेन्शन देऊन दिलासा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश आणि क्षेत्राच्या औद्योगिक विकासात आयुष्यभर मोलाचे योगदान देणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या या टप्प्यावर योग्य आर्थिक व सामाजिक संबल मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठामपणे मांडले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय कामगार मंत्र्यांना विनंती केली की, या गंभीर व संवेदनशील विषयावर वैयक्तिक लक्ष घालून आगामी कॅबिनेट बैठकीत अथवा मंत्रालयीन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. या निवेदनाचा स्वीकार करत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पेन्शनधारकांच्या मागण्यांवर योग्य व सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
























